'मला वडिलांना शेवटचं बघताही आलं नाही' प्रसाद ओकने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला 'भाऊ अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेचे...'

प्रसाद ओकच्या वडिलांचे कोव्हिड काळात निधन झाले. मात्र त्याला त्याच्या वडिलांना शेवटचं बघता देखील आलं नाही, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली.

नम्रता पाटील | Updated: May 2, 2024, 12:07 PM IST
'मला वडिलांना शेवटचं बघताही आलं नाही' प्रसाद ओकने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाला 'भाऊ अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेचे...' title=

Prasad Oak Talk About Father Death : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखले जाते. प्रसादने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. सध्या तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसाद ओकच्या वडिलांचे कोव्हिड काळात निधन झाले. मात्र त्याला त्याच्या वडिलांना शेवटचं बघता देखील आलं नाही, अशी खंत प्रसाद ओकने व्यक्त केली. यावेळी घडलेला संपूर्ण प्रसंगाबद्दल त्याने भाष्य केले. 

प्रसाद ओकने नुकतंच ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी प्रसाद ओकने वडिलांचे निधन, कोरोनाची पहिली लाट, बायो-बबलमध्ये चित्रीकरण आणि वडिलांचे अंत्यविधी याबद्दल भाष्य केले. “कोरोनाची पहिली लाट येऊन गेली होती. "आपण सगळेच भयानक भीतीमध्ये जगत होतो. थोडी कोरोनाची झळ कमी झाल्यानंतर सरकारकडून बायो-बबलमध्ये चित्रीकरण करण्याची परवानगी मिळाली. पण त्यासाठी मुंबईबाहेर जाणं फार गरजेचे होते. यामुळे एक युनिट त्या बायो-बबलमध्येच राहिल आणि त्या युनिटमधील एकही माणूस त्या जागेतून बाहेर जाणार नाही. तसेच एकही नवीन माणूस त्या जागेत येणार नाही. अशा पद्धतीने या कामाचे नियम सरकारने बनवले होते. आम्ही हे नियम पाळत महाराष्ट्राची हास्यजत्राचे पूर्ण मोठं युनिट मुंबई सोडून दमणला शूटींगसाठी गेलो." 

माझे वडील गेले असं बायकोने मला सांगितलं

"महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे शूटींग करण्यासाठी आम्ही दमणमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेट उभारला. तिथेच आमचे चित्रीकरण होणार होते. आम्ही 29 एप्रिलला दमणमध्ये पोहोचलो. सगळे सेटल झालो आणि 30 एप्रिलला ठरलेल्या शेड्यूलप्रमाणे पहिल्या एपिसोडचे सकाळी 9 वाजता चित्रीकरण सुरु होणार होतं. आम्ही सकाळी सहा-सात वाजता उठलो, आवराआवर केली. जरा फ्रेश झाल्यानंतर बघितलं तर बायकोचे 8 ते 10 मिस्डकॉल होते. मी झोपलो होतो. मी उठल्यानंतर ते पाहिलं. मग मी फोन केला. माझे वडील गेले, असे तिने मला सांगितलं." 

"मी पुण्याचा असल्याने तिथे खूप चांगले मित्र होते. अनेक ओळखी आहेत. एका मित्राच्या माध्यमातून त्यावेळेचे पुण्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची संपर्क झाला. मी त्यांना सांगितलं, ते माझे वडील आहेत. तर आपण काय करू शकतो? तर ते म्हणाले, साहेब परिस्थिती भयंकर वाईट आहे. अर्धा तास, पाऊण तास ठेवण्याची आम्हाला परवानगी आहे. जास्तीत जास्त तुम्ही मला फोन करताय, विनंती करताय म्हणून 15 मिनिटे किंवा अर्धा तास एवढाच वेळ ठेवू शकतो. पण तुम्ही आता दमणला आहात आणि आता ते पुण्यात आहेत. 

इथे मोबाईल आणण्याची परवानगी नाही

पुण्यात यायला तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 तास लागतील. एवढा वेळ आम्ही त्यांना ठेवू शकत नाही. भयंकर दबाव आहे. परिस्थिती खूप बिकट आहे. मी काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर मी पुण्यात येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण प्रवास करताना खूप बंधन होती. त्यावेळी आपण सहज प्रवास करु शकत नव्हतो. एवढं करुन ते ठेवणार नव्हतेच. म्हणून मी त्यांना विनंती केली की, भाऊ व्हिडीओ कॉल लावेल, मला वडिलांना शेवटचं बघू दे. ते म्हणाले, नाही साहेब. इथे मोबाईल आणण्याची परवानगी नाही. तुमचे भाऊ मोबाईल बाहेर ठेऊन आलेत. त्यामुळे तेही शक्य नाही. 

मी म्हटलं, तुमच्याकडे असेल तर तुमच्या फोनवरून व्हिडीओ कॉल लावता का? ते म्हणाले, मला परवानगी नाही. त्यामुळे मी ते करु शकत नाही. त्यामुळे मला वडिलांना शेवटचं पाहता आलं नाही. थोड्यावेळाने भाऊ इकडे वडिलांना अग्नी देत होता आणि तिकडे मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो,” असा भावूक प्रसंग प्रसाद ओकने सांगितला.