खात्यात 15 लाख जमा होणार? आग्र्यातील रॅलीत नरेंद्र मोदींचं मोठं आश्वासन, म्हणाले 'मी विचार करतोय की, पैसा...'

LokSabha Election: भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करण्याचा विचार मी करत आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आग्रा (Agra) येथील प्रचारसभेत केलं आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर 2014 मध्ये केलेल्या 15 लाखांच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 25, 2024, 06:15 PM IST
खात्यात 15 लाख जमा होणार? आग्र्यातील रॅलीत नरेंद्र मोदींचं मोठं आश्वासन, म्हणाले 'मी विचार करतोय की, पैसा...' title=

LokSabha Election: 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काळ्या पैशांविरोधात कारवाईचा उल्लेख करताना देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा होतील असं विधान केलं होतं. त्यांचं हे विधान त्यावेळी प्रचंड गाजलं होतं. यानंतर नितीन गडकरी, अमित शाह यांनी हा फक्त निवडणुकीमधील जुमला असल्याचं म्हटलं होतं. विरोधक आजही या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर टीका करत लक्ष्य करत असतात. दरम्यान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचं विधान केलं आहे. 

'अब की बार 400 के पार' अशी घोषणा दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रा (Agra) येथील प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी म्हटलं की, मी विचार करत आहे की भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करावा. नरेंद्र मोदींच्या या विधानामुळे 15 लाखांचं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. 

आग्रा येथील प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले की, "भ्रष्टाचाराविरोधात सतत कारवाई केली जात आहे. भ्रष्टाचाऱ्यांकडून पैसा परत केला जात आहे. मी विचार करत आहे की भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करावा". 

'जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत...'

नरेंद्र मोदींनी यावेळी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, "SC,ST,OBC च्या हक्कांवर दरोडा टाकण्याआधी आणि बहिणांच्या मंगळसूत्रावर नजर टाकण्याआधी इंडिया आघाडीच्या लोकांनो भिंतीवर जे लिहिलं आहे ते वाचा आणि ऐका की, 'जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत असं कोणतंही पाप करण्याआधी मोदीचा सामना करावा लागेल'. जो भ्रष्टाचारी असेल त्याचा तपास होईल. ज्यांनी गरिबांचा पैसा लूटला आहे, त्यांच्या लुटीचा पैसा गरिबांना परत मिळेल असा आमचा संकल्प आहे".

नरेंद्र मोदींनी यावेळी आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर धर्माच्या आधारे आऱक्षण दिलं जाणार नाही हे स्पष्ट झालं होतं. संविधान सभेतील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. भारताची राज्यघटना धर्माच्या आधारे आरक्षणाची परवानगी देत नाही, पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो प्रत्येक दिवशी बाबासाहेबांचा अपान करते आणि सामाजिक न्यायाची खिल्ली उडवतात".

 

तृष्टीकरणाच्या राजकारणाने देशाची विभागणी केली आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसंच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात (Congress Manifesto) मुस्लीम लीगचे (Muslim League) ठसे दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली. "आम्ही तृष्टीकरण संपवत असून, लोकांच्या समाधानासाठी काम करत आहोत," असं नरेंद्र मोदी म्हणाले.