'ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार', मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, 'आधी ते 15 लाख..'

PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: " 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले."

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 29, 2024, 07:41 AM IST
'ईडीने जप्त केलेले 3000 कोटी गरिबांना वाटणार', मोदींचं आश्वासन; ठाकरे गट म्हणाला, 'आधी ते 15 लाख..' title=
ठाकरेंची मोदींवर टीका

PM Modi Comment Saying Rs 3000 Crore Distribution To Poor: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये गरीबांमध्ये वाटणार असल्याचं विधान केलं आहे. मात्र या विधानावरुन आता उद्धव ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील आश्वासनाची आठवण करुन दिली. "तोंडभरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही. मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे. आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे. पश्चिम बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा ‘ईडी’ने जप्त केला आहे. तो त्या राज्यातील गरीबांना वाटणार, असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखविले आहे," असा टोला ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींनी लगावला आहे.

आश्वासन हवेत विरून जाणार?

"पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने राजघराण्यातील राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. मोदी यांनी अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गरीबांकडून लुटलेला पैसा गरीबांना परत करण्याच्या फुग्यात हवा भरली. मोदी यांनी ही घोषणा करताना सांगितले की, "पश्चिम बंगालमधील ईडीने सुमारे तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. हा सगळा सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा आहे. त्यातील बहुतांश रक्कम ही नोकरी मिळविण्यासाठी घेतली गेली आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा हा पैसा तिचा तिला मिळायला हवा, अशी आपली भूमिका आहे. भाजप सरकार त्यासाठी काही ना काही मार्ग काढेल." लाचखोरी किंवा अन्य मार्गाने सामान्य जनतेकडून लुटलेला पैसा परत जनतेलाच मिळावा, असे म्हणण्यात कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त मोदी यांचे हे आश्वासन सत्यात उतरणार की आजपर्यंतच्या अनेक आश्वासनांप्रमाणे लोकसभा निवडणूक संपल्यावर हवेत विरून जाणार? हा खरा प्रश्न आहे," असं ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

बेरोजगारी आणि 15 लाखांचं ते आश्वासन

"मोदी बोलतात खूप, भावनांना हात घालत आश्वासनांची पीकपेरणी करण्यात ते तरबेज आहेत, परंतु आतापर्यंत त्यांच्या या पेरणीचे पीक आपल्या पदरात का पडू शकलेले नाही, हा प्रश्न आजही जनतेला पडला आहे. पुन्हा त्याचे उत्तर देण्याऐवजी पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष आश्वासनांचे बिनहवेचे फुगे हवेत सेडत बसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी आणि त्यांच्या पक्षाने ‘महंगाई डायन’ नष्ट करण्याचे, काही कोटी रोजगार निर्माण करण्याचे, जीवनावश्यक वस्तूंची स्वस्ताई आणण्याचे आश्वासन दिले होते. आज सलग दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतर काय चित्र आहे? ना महागाई हटली ना बेरोजगारी. ना विकास झाला ना नवीन रोजगारनिर्मिती. किंबहुना आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्थेचा ताजा अहवाल मोदी सरकारच्या रोजगारनिर्मितीच्या दाव्यांचे वस्त्रहरण करणारा ठरला आहे. देशातील तब्बल 83 टक्के बेरोजगार तरुण आहेत. त्याचप्रमाणे अडीच दशकांपूर्वी बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा टक्का 35.2 इतका होता. तो आता थेट 65.7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारच्या आश्वासनांची तऱ्हा ही अशी आहे. आणि तरीही मोदी आता पश्चिम बंगालमधील गरीबांचा लुटलेला पैसा गरीबांना परत करण्याच्या बाता करीत आहेत. 2014 च्या निवडणूक प्रचारात परदेशातील काळा पैसा परत आणू आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करू, असे मोदी तोंड फाटेस्तोवर सांगत होते. मात्र दहा वर्षांत ना 15 लाख रुपये बँक खात्यात जमा झाले ना त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेवर मोदी यांनी तोंड उघडले. मोदी यांनी आपले शब्दही गिळले आणि वल्गनादेखील," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी

"आता पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या कस्टडीत असलेले तीन हजार कोटी रुपये तेथील गरीबांना वाटण्याचे शब्ददेखील मोदी निवडणुकीनंतर गिळून टाकू शकतात. आधी तुमचे ते 15 लाख रुपये बँक खात्यात कधी जमा करणार ते सांगा. पुन्हा ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरीबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ती ईडीच एक घोटाळा आहे. दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले. ‘चॅरिटी बिगिन्स अॅट होम’ याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील तीन हजार कोटींच्या गाजराची पुंगी वाजवा. पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनांचा घोटाळा आहे, हे जनतेच्या लक्षात आले आहे. 15 लाखांच्या भूलभुलय्यात ती फसली, मात्र ‘ईडी’ रकमेची तुमची लोणकढी थाप पश्चिम बंगालमधील जनतेला फसवू शकणार नाही, हे लक्षात ठेवा," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.