शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'

LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 10:23 AM IST
शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...' title=

LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर काही गंभीर आरोपही केले आहेत. उद्धव ठाकरेंचं सरकार राज्यातील अनेक मोठ्या भाजपा नेत्यांना अटक करण्याची योजना आखत होतं. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

'उद्धव ठाकरेंनीच पवारांना मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचवण्यास सांगितलं'

उद्धव ठाकरेंना नेहमीच मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते त्यांचं स्वप्नच होतं. 2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच त्यांनी आपण सर्व पर्याय खुले ठेवले असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरेंना पाचही वर्षासाठी मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांना ठाकरे कुटुंबातच मुख्यमंत्रीपद ठेवायचं होतं असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाकारलं. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपल्याला तुम्हाला मुख्यमंत्री करु असं सांगितलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. "जेव्हा महाविकास आघाडी सरकार तयार होत होतं, तेव्ही मी मुख्यमंत्री होण्याची आशा असल्याने माझ्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पण नंतर मला शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं असल्याचं सांगण्यात आलं. पण शरद पवारांनी नंतर मला स्पष्टीकरण देत शिवसेनेने उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी लोकांना पाठवलं होतं असं सांगितलं. म्हणजेच उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी शरद पवारांना त्यांनीच सांगितलं होतं".

दरम्यान यावेळी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना सरकार पाडण्याची योजना आखल्याचा आरोप नाकारला. ते म्हणाले की, "ते षडयंत्र नव्हे तर बंड होतं. राज्यसभा निवडणुकीसाठी विधानभवनात मतदान सुरु असताना याची तयारी झाली होती. खरं तर मी सर्व आमदारांना संजय राऊतांना मत देण्यास सांगितलं आणि नंतर सूरतसाठी निघालो. आम्ही संजय राऊतांचा पराभव करु शकत होतो, पण तसं केलं नाही. आम्ही सूरतला पोहोचेपर्यंत फोन येत होते. वसईतील चहाच्या टपरीवरुन माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांनी मला तेव्हा मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. पण तेव्हा फार उशीर झाला होता. नंतर मी हे जाहीरपणे केलं. त्यांनी दिल्लीत भाजपाला फोन करुन एकनाथ शिंदेंसह का जात आहात? आपण युती करु शकतो असंही सांगितलं होतं. पण तोपर्यंत काही उरलं नव्हतं". 

'शिवसेना 16 जागा लढणार'

शिवसेना राज्यातील 16 जागा लढणार आहे. यामध्ये मुंबईतील 3 जागांचा समावेश आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन कोणताही वाद नाही. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही 2019 मधील 42 जागांचा रेकॉर्डही यावेळी मोडू असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

भाजपा नेत्यांच्या अटकेची योजना

महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना आखत होतं असा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.