एक लाख अ‍ॅडव्हान्स, पनवेलच्या फार्म हाउसची पण रेकी; आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात कसे आले?

Salman Khan firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबार करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 17, 2024, 11:23 AM IST
एक लाख अ‍ॅडव्हान्स, पनवेलच्या फार्म हाउसची पण रेकी; आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात कसे आले? title=
Salman Khan's house firing incident Lawrence Bishnoi gang give one lakh to accused

Salman Khan firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी दोघा आरोपींनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सलमानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी लाँरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. अनमोल बिश्नोई याने एक फेसबुक पोस्ट करत धमकीवजा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक केली आहे. आता या घटनेत अनेक नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस लगेचच अॅक्शन मोडमध्ये आले होते. गुन्हे शाखेने तब्बल 12 पथके तैनात केली होती. आरोपींनी गुजरातच्या भूज येथून अटक करण्यात आली. आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही बिहार येथील चंपारण येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघा आरोपींनी लाँरेन्स बिश्नोई गँगने सुपारी दिली होती. गोळीबार करण्यापूर्वी त्यांनी 3 दिवस घराची रेकी केली होती. 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान सलमान खानच्या घरापासून एक किमी दूर असलेल्या हॉटेल ताज लँड्स अँडच्या जवळपास पाहण्यात आले होते. पोलिसांना संशय आहे, आरोपी सागर पाल हा लाँरेन्स गँगच्या संपर्कात आला होता. तो दोन वर्षांपर्यंत हरियाणामध्ये राहत होता. त्याचवेळी तो लाँरेन्स गँगच्या संपर्कात आला होता. तर, दुसरा आरोपी विक्की गुप्ता याने नंतर सागरला जाँइन केले. 

सलमानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी दोघा हल्लेखोरांना सुरुवातीला जवळपास एक लाख रुपये देण्यात आले होते. त्याचाच वापर करुन दोघांनी पनवेलमध्ये घर भाड्याने घेतले होते. सेंकड हँड बाइक खरेदी केली होती. तसंच, त्यातूनच रोजचा खर्च करत होते. दोघांनाही सलमानच्या पनवेलच्या फार्महाउसपासून जवळपास 13 किमी दूर भाड्याने घर खरेदी केले होते. इथूनच त्यांनी फार्महाउसचीही रेकी केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाकीचे पैसे देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळंच त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी चंपारण ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा प्रवास केला होता. 

घर भाड्याने घेतल्यानंतर दोघांनीही रेंट अॅग्रीमेंटदेखील बनवले होते. त्यासाठी त्यांना स्वतःचे खरे आधारकार्ड देखील दिले होते. त्यांनी घर मालकाला 10 हजार रुपये अॅडव्हान्स जमा केले होते आणि दरमहिना 3500 रुपये भाडे देत होते. पनवेलमध्ये काही दिवस राहिल्यानंतर ते 18 मार्च रोजी चंपारणला निघून गेले. त्यानंतर 1 एप्रिल रोजी दोघे परत आले. त्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी पाच वाजता मोटारसायकलवर स्वार होऊन दोघांनी वांद्रे येथील सलमान खानच्या घरावर गोळीबार केला.