लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतली

Dombivali Girl Died After Falling From Running Local Train: ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्याने तिने डोंबिवली स्थानकामधून फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. मात्र बराच वेळ तिला आतमध्ये सरता आलं नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 30, 2024, 12:03 PM IST
लोकलमधून पडून 26 वर्षीय डोंबिवलीकर तरुणीचा मृत्यू; ऑफिसला जाण्याची घाई जीवाशी बेतली title=
तिने जागीच प्राण सोडला

Dombivali Girl Died After Falling From Running Local Train: मध्य रेल्वेच्या कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका 26 वर्षीय तरुणीने प्राण गमावल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. मरण पावलेल्या तरुणीचं नाव रिया राजगोर असं असून ती डोंबिवलीत राहत होती. गर्दीमुळे लोकलच्या डब्यात आतमध्ये शिरता न आल्याने रिया धावत्या लोकलमधून कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान पडली. या दुर्घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिला मृत्यू झाला. 

नेमकं घडलं काय?

रिया ही ठाण्यामधील एका बांधकामासंदर्भातील कंपनीमध्ये कामाला होती. सोमवारी तिने डोंबिवली स्थानकामधून ठाण्याच्या दिशेला जाणारी अप मार्गावरील लोकल ट्रेन पकडली. ट्रेनला गर्दी होती. मात्र थोडं पुढे गेल्यानंतर आतमध्ये जागा होईल आणि आपण आत सरू असं वाटल्याने रियाने फुटबोर्डवर उभं राहून प्रवास सुरु केला. ट्रेन डोंबिवलीवरुन सुटली तेव्हा रिया ही फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या माहिलांपैकी एक होती. तिच्यासोबतच्या काहीजणींना आतमध्ये शिरता आलं. मात्र गर्दी असल्याने तिला आतमध्ये शिरताच आलं नाही. बराचवेळ ती दारामध्ये लटकून उभी होती. तिने अशा अवघडलेल्या अवस्थेत बराच अंतर प्रवास केला. लोकलने वेग पकडल्यानंतर कोपर स्थानकाजवळ तिचा तोल गेला आणि ती रुळावर पडली. तिच्या डोक्याला इतक्या जोरात दणका बसला की जागीच तिने प्राण सोडला. रियाच्या घरी आई-वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.

मागील आठवड्यात एकाने गमावला प्राण

मागील आठवड्यामध्ये म्हणजेच 23 एप्रिल रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून अवधेश दुबे नावच्या तरुणाचाही अशाचप्रकारे अपघाती मृत्यू झाला होता. मुंब्रा खाडीजवळ त्याचा हात सटकल्यानंतर तो खाडीत पडला आणि याच दुर्घटनेत त्याने प्राण गमावले. 

या 3 कारणांमुळे कल्याण-डोंबिवली लोकलला कायम गर्दी असते

कल्याण-डोंबिवलीमधून रोज लाखोंच्या संख्येनं प्रवासी मुंबईच्या दिशेने म्हणजेच अप मार्गाने कार्यालयीन कामांसाठी प्रवास करतात. पीक अवर्स म्हणजेच सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी या गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतात. गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना डब्यामध्ये उभं राहण्यासाठीही जागा नसते. अशावेळेस ऑफिसला उशीर होत असल्याने किंवा वेळेत पोहोचायचं असल्याने अनेकजण जीव धोक्यात घालून दारात उभं राहून प्रवास करतात. त्यात मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन बहुतांश वेळा उशीराने धावत असतात. लोकल रद्द होण्याचं प्रमाण, प्रवाशी संख्येच्या तुलनेत कमी फेऱ्या, एसी लोकलमुळे नंतरच्या लोकलवर येणारा ताण यासारख्या गोष्टींमुळेही लोकल ट्रेनच्या डब्ब्यांमधील गर्दी वाढते.