ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी

IPL 2024 India Next T20 Captain After Rohit Sharma: सध्या आयपीएल 2024 मध्ये अनेक तरुण भारतीय क्रिकेटपटू वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली, लखनऊ, राजस्थान, कोलकाता, गुजरात, चेन्नईच्या संघाची धुरा सध्या तरुण भारतीय क्रिकेटपटूंच्या हाती आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 23, 2024, 02:00 PM IST
ना गिल, ना हार्दिक, ना अय्यर, ना ऋतू रोहितनंतर 'या' खेळाडूला करा T-20 चा कॅप्टन; हरभजनची मागणी title=
हरभजन सिंगने केली मागणी

IPL 2024 India Next T20 Captain After Rohit Sharma: टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघांची घोषणा होण्याआधीच एका माजी क्रिकेटपटूने मोठी मागणी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाविरुद्धचा सामना राजस्थानने जिंकल्यानंतर ही मागणी करण्यात आली आहे. राजस्थानने घरच्या मैदानावर मुंबईला यंदाच्या पर्वात सलग दुसऱ्यांदा धूळ चारल्यानंतर एक मोठं विधान करण्यात आलं आहे.

राजस्थानकडून मुंबई पराभूत

राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यामध्ये राजस्थानच्या संघाने मुंबईच्या संघाला 8 बॉल आणि 9 विकेट्स राखून पराभव केला. या खेळीमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांबरोबर फलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. आधी गोलंदाजीमधील अचूक बदल आणि नंतर सामना जिंकवून देताना शतकवीर यशस्वी जयस्वालला साथ देत संजू सॅमसनने दोन्ही डावांमध्ये उत्तम कामगिरी करत कर्णधारपदाला साजेसा खेळ केला. 

सामन्यानंतर संजू काय म्हणाला?

"विजयाचं श्रेय सर्व खेळाडूंना दिलं पाहिजे. पॉवर प्लेमध्ये आम्ही चांगली सुरुवात केली. सामन्याच्या मध्यांतरादरम्यान डावखुऱ्या फलंदाजांनी भन्नाट फटकेबाजी केली. आम्ही ज्याप्रकारे पुनरागमन केलं जिथेच आम्ही सामना जिंकलो. खेळपट्टी थोडी कोरडी वाटत होती. मात्र दिव्याच्या प्रकाशाखाली खेळताना खेळपट्टी रात्री थोडी थंड पडली. त्यामुळे दुसऱ्या डावात ती फलंदाजीसाठी अधिक सुखकर झाली," असं सामना संपल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला. 

सहा संघांचं नेतृत्व भारतीय तरुणांकडे

सध्या संजूबरोबरच मुंबई, दिल्ली, लखनऊ, कोलकाता, गुजरात, चेन्नईच्या संघाची धुराही तरुण भारतीय क्रिकेटपटूंकडेच आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे. गुजरातच्या संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर चेन्नईचं नेतृत्व यंदा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलं आहे. लखनऊ सुपरजायंट्सचं नेतृत्व के. एल. राहुल करत आहे.

नक्की वाचा >> 'मोठे फटके मारण्याची हार्दिकची क्षमता...'; हार्दिकचा टी-20 वर्ल्डकपमधील पत्ता कट?

कोणत्या क्रिकेटपटूने काय मागणी केली?

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने राजस्थानच्या संघाची आयपीएलमध्ये धूरा संभाळणाऱ्या संजू सॅमसनला भारताचा भविष्यातील टी-20 संघांचा कर्णधार म्हणून प्रशिक्षण दिलं जावं असं म्हटलं आहे. हरभजन सिंगने आपलं मत एक्स (ट्विटरवर) व्यक्त केलं आहे. हरभजन सिंगने राजस्थानच्या संघाचा सलामीवीर यशस्वी जयसवालचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे.  यशस्वी जयसवालची खेळी ही दर्जा हा कायम स्वरुपी असतो तर फॉर्म हा तत्पुरता आहे, हे दर्शवणारी आहे. तसेच आपल्या संघात (टीम इंडियामध्ये) विकेटकीपर बॅट्समन कोण असावा याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही जर आपल्याकडे संजू सॅमसन आहे. संजू सॅमसनला भारताच्या टी-20 वर्ल्डकप संघात स्थान दिलं पाहिजे. तसेच रोहितनंतर टी-20 संघाचा कर्णधार म्हणून संजूला प्रशिक्षण दिलं पाहिजे. यात काही शंका आहे का? असा प्रश्न हरभजनने विचारला आहे.

संजूच्या नेतृत्वाखाली प्लेऑफमध्ये जवळपास स्थान निश्चित

राजस्थानने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी हा त्यांचा 7 वा विजय आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये राजस्थानचा संघ पहिल्या स्थानी आहे. राजस्थानच्या संघाचे एकूण 14 पॉइण्ट्स असून त्यांच्या इतके सामने कोणीही जिंकलेले नाहीत. दुसऱ्या स्थानी असलेल्या कोलकात्याच्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. राजस्थानचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. सामान्यपणे 8 सामने जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये राहून प्लेऑफसाठी पात्र ठरतो. राजस्थानला 8 विजयांसाठी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.

नक्की वाचा >> ना गिल ना जयस्वाल! गांगुली म्हणतो, 'वर्ल्डकपमध्ये हे दोघे असावेत भारताचे ओपनर्स'; पटतंय का?

संघातही स्थान नव्हतं आता थेट कर्णधार?

विशेष म्हणजे आयपीएलपूर्वी झालेल्या अनेक मालिकांमध्ये संजूचा संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. अनेकदा यासंदर्भात चाहत्यांनी सोशल मीडियावरुन नाराजीही व्यक्त केली होती. मात्र ज्यापद्धतीने संजूने राजस्थानच्या संघाचं नेतृत्व केलं आहे ते पाहता आता त्याला थेट संघात स्थान देऊन भावी कर्णधार म्हणून हळूहळू ग्रूम करावं अशी मागणी माजी क्रिकेटपटू करु लागले आहेत. आतापर्यंत रोहितनंतर हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व जाईल अशी चर्चा केली जात होती. मात्र ही चर्चा पंड्याची सध्याची कामगिरी पाहता थंड पडली आहे. त्यामुळेच आता संजू सॅमसन भावी कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार ठरु शकतो याचेच हे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे.