गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...'

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर गोळीबार करण्यात आल्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2024, 04:46 PM IST
गोळीबारानंतर सलमान खानचा गॅलॅक्सी सोडण्याचा निर्णय? अरबाजने केला खुलासा, म्हणाला 'आम्ही आता...' title=

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीच्या (Galaxy) बाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास करत आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान आणि कुटुंबीयांची भेटही घेतली होती. तसंच सलमानसह कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान मुंबईतील निवासस्थान सोडून पनवेलच्या फार्महाऊसवर वास्तव्याला जाणार असल्याची चर्चा आहे. यावर सलमान खानचा भाऊ अरबाज खानने (Arbaaz Khan) प्रतिक्रिया दिली आहे. 

सलमान खान वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. सलमान खानच्या घरासमोर रोज लाखो चाहते त्याला पाहण्यासाठी गर्दी करत असतात. अरबाज खानला गोळीबारानंतर खान कुटुंब दुसरीकडे जाणार आहे का? असं विचारलं असता सांगितलं की, "त्यानंतर हे सर्व बंद होईल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे उद्या आम्ही जर जागा बदलली तर जो धोका आहे, तो पूर्णपणे नष्ट होईल? तसं होत असतं तर प्रत्येकाने तेच केल असतं. पण तसं होणार नाही हे वास्तव आहे. मग तुम्ही नेहमी जागा बदलत राहणार की फक्त सावधगिरी बाळगणार?".

आपले वडील सलीम खान गेल्या अनेक दशकांपासून या घरात राहत असल्याचं यावेळी सांगितलं. तसंच सलमान खानने आपल्या आयुष्यातील मोठा भाग याच घरात घालवला असल्याचंही म्हटलं. 'तेच त्याचं घर आहे', असं अरबाज म्हणाला आहे. 

आम्ही जागा बदलली तर असे हल्ले पूर्पणणे थांबणार असं काही नसल्याचंही अरबाज म्हणाला. "तुम्ही जर घरं रिकामं केलं तर आम्ही तुम्हाला जाऊ देवू असं कोणीही म्हणत नाही आहे. त्यामुळे त्यात तसं काही नाही," असं अरबाजने म्हटलं. पुढे त्याने म्हटलं की, "जास्तीत जास्त सावधगिरी बाळगणं किंवा सरकार जे काही पुरवत आहे त्यावर निर्भर राहणं इतकंच काय ते एखादी व्यक्ती करु शकते. जितकं शक्य आहे तितकं सामान्यपणे जगणं इतकंच आपल्या हातात आहे. जर आपण सतत भीतीखाली जगत राहिले तर घऱाबाहेर पडू शकणार नाही".

14 एप्रिल रोजी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सलमान खाच्या घरावर गोळीबार केला होता. त्यांनी एकूण 5 गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबार झाला तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरात होते. यात कोणीही जखमी झालं नाही. 

गोळीबारानंतर अरबाजने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं की, “सलीम खान कुटुंबीयांच्या निवासस्थानी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करण्याची अलीकडील घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे. या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे”.