'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सुरु असणारी रणधुमाळी आणि त्यातूनच नेतेमंडळींकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप प्रत्यारोप सध्या चर्चेत आहेत.   

सायली पाटील | Updated: Mar 29, 2024, 12:07 PM IST
'बाळासाहेबांवरही हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती'; नाव न घेता अभिनेत्याचा राज ठाकरेंना टोला title=
loksabha election 2024 marathi Actor kiran mane slams mns raj thackeray on joining bjp alliance latest news in marathi

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्व राजकारणी त्यांच्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या हेतूनं रणनिती आखतानाच यामध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. मयायुतीमघ्ये राज्यातील बड्या पक्षांना समाविष्ट करून घेणाऱ्या भाजपला आता राज ठाकरे यांच्या मनसेचीही साथ मिळताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या (BJP) भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकी आणि राज्याच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चा पाहता राज ठाकरे यांच्या अधिकृत घोषणेचीच प्रतीक्षा अनेकांना आहे. 

हिंदुत्वं, महाराष्ट्र आणि मराठी माणूस या विषयांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या राज ठाकरे यांनी महायुतीशी केलेली हातमिळवणी अद्याप जाहीर झाली नसली तरीही तसे संकेतही अनेकांच्या रोष ओढावत आहेत. त्यातच एका मराठमोळ्या अभिनेत्यानंही आपली भूमिका स्पष्ट करत राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

'आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरून' त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते', असं म्हणत राज ठाकरे यांची महायुतीत जाण्याची भूमिकाच अमान्य असल्याचं मत त्यांचं नाव न घेता अभिनेते किरण माने यांनी मांडली. 

बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडणाऱ्या किरण माने यांनी या राजकीय धुमश्चक्रित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा पाहता हे पाठबळ नेमकं का मिळतंय हेसुद्धा स्पष्ट केलं. 

माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? 

'उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं कॉपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला. समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्‍या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते. उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव 'कॅश' करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं. आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.'
....तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरून' त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.

हेसुद्धा वाचा : Mumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद ठेवण्याचा निर्णय; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक 

बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत. आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते. आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय. कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.'