चिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

Sharad Pawar Party Manifesto Important Points: पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार गटाने त्यांच्या जाहीरनाम्याची घोषणा केली. यावेळेस जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील मुद्द्याचं वाचन करुन दाखवत हा जाहीनामा नसून शपथपत्र आहे, असं म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 25, 2024, 10:58 AM IST
चिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे title=
पुण्यात घोषित केला जाहीरनामा

Sharad Pawar Party Manifesto Important Points: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्याची घोषणा केली. पुण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याची घोषणा करण्यात आली. वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. हा आमचा जाहीरनामा नसून शपथपत्र आहे असं शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (दिवसभारतील राजकीय घडामोडींच्या अपडेट्स जाणून घ्या येथे क्लिक करुन)

जाहीरनामा नाही शपथपत्र

आम्ही मर्यादित जागा लढवत आहोत. आम्ही यंदा दहाच जागा लढवत असून आम्ही जो जाहीरनामा केला आहे त्यासाठी आम्ही संसदेत आग्रही असणार आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. हा आमचा जाहीरनामा नसून शपथपत्र आहे असं शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा करताना जयंत पाटील यांनी म्हटलं. जयंत पाटील यांनी जाहीरनाम्याचं वाचन करुन दाखवलं. 

जाहीरनामा बनवताना अनेक गोष्टींचा केला विचार

जाहीरनामा बनवणाऱ्या वंदना चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना, "जाहीरनामा तयार करण्यासाठी मला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अनेक लोकांकडून माहिती घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. आम्हाला अनेक सूचना या आल्या होत्या. त्याचा आम्ही जाहीरनामा तयार करताना विचार केला आहे. पुढच्या काळात काही इनपुट आल्यास त्यासंदर्भातही आग्रही असू," असं म्हणाल्या. युवा, महिला, युवती, शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, अल्पसंख्याक अश्या अनेक घटकांचा पवार गटाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. नागरी विकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, परराष्ट्रीय धोरण याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण विषय या शपथपत्रमध्ये आहेत, असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.

जाहीरनाम्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश

> स्वयंपाक गॅसची किंमत 800 रु करणार

> पेट्रोल-डिझेलवरील कर मर्यादित करणार

> शासकीय नोकऱ्यामधील रिक्त जागा भरणार

> महिलांचं नोकऱ्यांमधील आरक्षण 50 टक्के करणार

> एक टॅक्स करताना या देशात राज्यातील विभिन्नता असल्याने राज्याला कायदा करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. केंद्रातील यासंदर्भातील हस्तक्षेप कमी करू

> डिग्री आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 8000 रु स्टायफन देणार

> महिलेच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार

> शाळांना सेफ्टी ऑडिट करण्याचा आग्रह करणार

> शेतीसंदर्भातील नवीन तंत्रज्ञानाना पुढाकार देणार

> सत्तेत आल्यावर कंत्राटीकरण बंद करणार

> जातनिहाय जनगणना करणार

> आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांची अट दूर करणार

> खाजगी शैक्षणिक संस्थेत आरक्षण देणार

> अल्पसंख्यांकसाठी मौलाना आझाद योजना पुन्हा सुरू करणार

> जिल्हा आणि तालुका स्तरावर आरोग्यासंदर्भातील सुविधा उपलब्ध करुन देणार

> शेती आणि शैणिक गोष्टींवरील कर आम्ही कमी करू 

> चीनी सीमेवर जी घुसखोरी झाली आहे त्याविरोधात आमचे खासदार आवाज उठवतील 

> न्याय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी खटले प्रलंबित आहेत. हे काम जलद गतीने होण्यासाठी न्याय यंत्रणेत सुधारणा करुन वाढ करणार.