'..त्यामुळे RSS, करकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली', ठाकरे गटाचा दावा; म्हणाले, 'निकम हे छुपे..'

Uddhav Thackeray Group On Hemant Karkare Death: 26/11चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत, असा उल्लेखही ठाकरे गटाने केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 8, 2024, 07:39 AM IST
'..त्यामुळे RSS, करकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली', ठाकरे गटाचा दावा; म्हणाले, 'निकम हे छुपे..' title=
ठाकरे गटाने मांडली आपली भूमिका

Uddhav Thackeray Group On Hemant Karkare Death: भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भातील विषयास फोडणी दिली. भाजपचा हा स्वभाव आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने सध्या राज्यात सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. मात्र या प्रकरणामध्ये ठाकरे गटाने आपली भूमिका काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतापेक्षा वेगळी असल्याचं ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदर्भ हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात का दिला जातो यासंदर्भातील सविस्तर भाष्य ठाकरे गटाने केलं आहे. 

सर्व अधिकारी दहशतवाद्यांच्याच गोळ्यांना बळी पडले

"निवडणूक काळात कधी कोणत्या विषयाचा धुरळा उडवला जाईल व गाडलेले मुडदे उकरून काढले जातील त्याचा नेम नाही. ‘26/11’चा मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांचाच हल्ला होता व त्यामागे पाकिस्तानचेच षड्यंत्र होते. पाकिस्तानने समुद्रमार्गे पाठवलेल्या कसाब व त्याच्या टोळीने ताज महाल हॉटेल, कामा इस्पितळ, छाबड हाऊस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा सार्वजनिक ठिकाणी हल्ले केले. रक्ताचे सडे पाडले. मुंबईसह संपूर्ण देश हा हल्ला प्रत्यक्ष पाहत होता. मुंबईचे पोलीस दल बेसावध असताना हल्ला झाला. त्यामुळे एकच धावाधाव झाली. कसाब टोळीच्या हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह वीसेक पोलिसांना हौतात्म्य पत्करावे लागले. हे सर्व अधिकारी दहशतवाद्यांच्याच गोळ्यांना बळी पडले. त्यांच्या हौतात्म्याने देश हळहळला. मरीन लाइन्स येथे फौजदार तुकाराम ओंबळे यांनी पळून जाणाऱ्या कसाबला अडवले व झडप घातली. त्या झटापटीत ओंबळे हे जागीच शहीद झाले. कसाबच्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले हे त्या दिवशी जगाने पाहिले व ओंबळे यांच्या शौर्यास मानवंदना दिली. कामठे, करकरे, साळसकर शहीद झाले तर सदानंद दाते यांच्यासह इतर पोलीस अतिरेक्यांशी लढतानाच गंभीर जखमी झाले. अशोक कामठे यांच्यासोबत ‘चकमक’फेम विजय साळसकर यांनाही कामा इस्पितळाच्या अंधाऱ्या गल्लीत वीरमरण आले. अंधाराचा फायदा घेऊन अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला हे सत्य आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

निकम हे छुपे संघवादी

"‘26/11’च्या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक पोलिसाला पाकड्या अतिरेक्यांचीच गोळी लागली, पण हेमंत करकरे यांना अतिरेक्यांची गोळी लागली नसून त्यांची हत्या झाल्याची थिअरी का सुरू झाली? हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामागे कोणाचे तंत्र आहे हे समजून घेतले पाहिजे. 26/11चा खटला चालवणारे उज्ज्वल निकम हे वकील भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर मुंबईत निवडणूक लढत आहेत. निकम हे छुपे संघवादी होते हे आता उघड झाले व त्यांनी कसाबच्या खटल्यातील अनेक सत्य दडवले व प्रचारात अनेक खोटे मुद्दे आणले. ते कशासाठी?" असं 'सामना'मध्ये म्हटलं आहे.

संघ आणि करकरे कनेक्शन काय?

"कसाब हा एक भयंकर अपराधी होता व त्यास इतर सामान्य कैद्याप्रमाणेच ऑर्थर रोड तुरुंगात वागणूक मिळत होती. तरीही अॅड. निकम खोटे बोलत राहिले, पण महत्त्वाचा विषय आहे हेमंत करकरे यांचा. करकरे यांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच भांडण सुरू होते. संघ परिवार करकरे यांच्या कार्यपद्धतीवर व त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर केलेल्या कारवाईवर खूश नव्हता. मालेगाव बॉम्बस्फोटाचे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून हेमंत करकरे हाताळत होते. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद वगैरे संघ परिवाराशी संबंधित लोकांना करकरे यांनी अटक केली. मालेगावातील बॉम्बस्फोट हे संघाचे कारस्थान असल्याचे करकरे व त्यांच्या पथकाचे म्हणणे होते व तपासात त्यांनी तसे पुरावे समोर आणले. प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित यांचा कोठडीत छळ सुरू आहे व त्यांच्या तोंडून हवे ते काढून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघाचे म्हणणे होते. मालेगावचा कट करकरे यांच्यामुळे उघडा पडला व देशात हिंदू-मुसलमान दंगे घडविण्याचा ‘डाव’ कसा खेळला जात आहे ते करकरे यांच्यामुळे उघड झाले. त्यामुळे संघ परिवार व करकरे यांच्यात ठिणगी पडली," असा उल्लेख ठाकरे गटाने केला आहे.

करकरेंसंदर्भातील दावा तर्कसंगत नाही

"करकरे यांच्या खेळीमागचे खरे सूत्रधार दुसरेच कोणी तरी आहेत, असे संघ वर्तुळात बोलले जात होते व त्याच वेळी मालेगावचा तपास करकरे अधिक खोलात जाऊन करू लागले. त्यातून इतर अनेक गोष्टी उघड्या होतील हे भय संघ परिवारास वाटू लागले व त्यांनी करकरे यांच्याविरुद्ध मोहीम सुरू केली. ही मोहीम रंग भरत असतानाच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला व त्यात करकरे हे अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी गेले, हे वास्तव नाकारता येणार नाही. 26/11च्या हल्ल्यात इतर सर्व पोलीस दहशतवादाचे बळी पडले व एकटे करकरे हे संघाशी संबंधित पोलिसाच्या गोळीबारात मरण पावले हे तर्कसंगत नाही," अशी भूमिका ठाकरे गटाने मांडली आहे.

हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत

"हेमंत करकरे यांना वीरमरण आले व देशाला त्यांच्या हौतात्म्याचा गर्व आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे लोकसभा उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करताना करकरे यांच्या हौतात्म्याचा संदर्भ दिला. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कोणतेच मुद्दे नसल्याने त्यांनी या विषयास फोडणी दिली. भाजपचा हा स्वभाव आहे. मुळात सध्या भाजपच्या गोटातील ‘स्टार प्रचारक’ हसन मुश्रीफ यांच्याच घरातून करकरे यांची बदनामी सुरू झाली. मुश्रीफ यांचे तेव्हा पोलीस खात्यात असलेले भाऊ एस. एम. मुश्रीफ यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे रहस्य असल्याचे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी कागल येथे जाऊन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करावी. करकरे हे देशासाठी शहीद झाले व देशाला या वीरपुत्राचा अभिमान आहे. शिवसेनेची तीच भूमिका आहे. हौतात्म्याचे धिंडवडे कोणीच काढू नयेत," असा सल्ला ठाकरे गटाने लेखाच्या शेवटी दिला आहे.