अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला "परंपरा" हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Apr 19, 2024, 12:58 PM IST
अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : सध्या अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. तर अनेक सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या परंपरा या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा जोरदार चर्चेत आहे. 

समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम या आशयसूत्रावर बेतलेला "परंपरा" हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे. 

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो  यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

प्रतिकूल परिस्थितीतही परंपरेच्या जपणुकीवर लक्ष केंद्रित करणारा हा चित्रपट आहे. विशेषत: महाराष्ट्रातील, जिथे सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांच्या मनात खोलवर परिणाम करणारं कथानक या चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्र निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.    
 "परंपरा" एक समृद्ध सिनेमॅटिक अनुभव देण्यास तयार आहे.

एकंदरीत ‘परंपरा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनच नाही, तर आजच्या बदलत्या जगात वारसा आणि परंपरेचे महत्त्व दर्शवणारा आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबाचं जगणं, सामाजिक ताण याचं दर्शनही हा चित्रपट घडवतो. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच अंतर्मुख करेल यात शंका नाही.