फडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..'

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळेस शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या आगामी 7 सभांबरोबरच फडणवीसांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 25, 2024, 11:39 AM IST
फडणवीसांच्या 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' टीकेवर पवार म्हणाले, 'त्यांना पराभवाची..' title=
शरद पवारांनी टीकेला दिलं उत्तर

Sharad Pawar Slams Modi Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली. गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. यावेळेस पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी उत्तर दिलं. तसेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढील 3 दिवसात राज्यात 7 सभा असल्याच्या मुद्द्यावरुनही पवारांनी निशाणा साधला. 

मोदींच्या 7 सभांवरुन पवारांची टीका

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात सध्या सभांचा धडाका लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत सभा घेतल्या आहेत. आता पुढील 3 दिवसांत मोदी महाराष्ट्रात 7 सभा घेणार आहेत. याचसंदर्भात शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी, "नरेंद्र मोदी यांना भीती वाटते आहे त्यामुळे ते महाराष्ट्रात तीन दिवसात सात सभा घेत आहेत," असं उत्तर दिलं.

कोलांटी उड्यांवरुन फडणवीसांना टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पवार सतत कोलांटी उड्या घेतात' अशी टीका केली होती. यासंदर्भातही पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, "त्यांना पराभवाची भिती वाटते. त्यामुछे ते अशा पद्धतीची टीका करत आहेत," असा टोला लगावला. तसेच पुढे बोलताना शरद पवारांनी, 'मी विकासावर बोलतो. ते मात्र पराभवाच्या चिंतेतून अशापद्धतीने व्यक्त होत आहेत,' असंही म्हटलं. 'महाराष्ट्रात बदलाचा मूड दिसत आहे,' असं सूचक विधान शरद पवारांनी केलं.

नक्की वाचा >> चिनी घुसखोरीपासून आरक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत..; पवारांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

पदमसिंह पाटलांवर साधला निशाणा

डॉक्टर पदमसिंह पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवारांनी लातूरचा विकास झाला मात्र धाराशिवचा नाही असं म्हटलं. "पाठीमागून निर्माण झालेला लातूर जिल्ह्याचा विकास झाला. मात्र धाराशिवचा झाला नाही. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यापेक्षा इथल्या नेतृत्वाला जास्त संधी मिळाली तरीही विकास होऊ शकला नाही," असं म्हणत शरद पवारांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

जाहीरनाम्यासाठी आग्रही असणार

आम्ही मर्यादित जागा लढवत आहोत. आम्ही यंदा दहाच जागा लढवत असून आम्ही जो जाहीरनामा केला आहे त्यासाठी आम्ही संसदेत आग्रही असणार आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.